जानेवारी 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा
जानेवारी 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Marathi movies released in January 2025 and their reviews
Written by : के. बी.
Updated : मार्च 14, 2025 | 01:09 PM
बघता बघता २०२४ हे साल सरलं. २०२४ मध्ये सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत नवीन नवीन प्रयोग केले गेले. काही प्रेक्षकांना आवडले तर काही सपशेल फसले. आता २०२५ मध्ये नवीन काय काय बघायला मिळेल हे येणारं वर्षच सांगेल. आज या लेखात वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात कोणते मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते कसे आहेत ते बघू.
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण जानेवारी २०२५मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.
जानेवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

१. मु.पो. बोंबीलवाडी (Mu. Po. Bombilwaadi) |
लेखक | परेश मोकाशी |
दिग्दर्शक | परेश मोकाशी |
कलाकार | प्रशांत दामले,आनंद इंगळे,वैभव मांगले,गीतांजली कुलकर्णी,सुनिल अभ्यंकर,राजेश मापुस्कर,प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर , दिप्ती लेले |
निर्माता | मधुगंधा कुलकर्णी, भरत शितोळे |
रिलीज तारीख | १ जानेवारी २०२५ |
भाषा | मराठी |
“मु.पो. बोंबीलवाडी” चित्रपट समीक्षा :-
वर्षाच्या सुरुवातीलाच पहीलाच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट म्हणजे मु.पो.बोंबीलवाडी. परेश मोकाशी यांच्या स्वतःच्याच एका रंगमंचावरील नाटकाचं रूपांतर चित्रपटात करण्यात आलेलं असून यात कलाकारांची बरीच मोठी फौज आहे. प्रशांत दामले,आनंद इंगळे,वैभव मांगले,गीतांजली कुलकर्णी,सुनिल अभ्यंकर,राजेश मापुस्कर,प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर आणि दिप्ती लेले आणि अजून बरेच. खरं तर इतके कलाकार आणि खुद्द अभ्यासू म्हणून प्रसिद्ध असलेले परेश मोकाशी यांचा हा मु.पो.बोंबीलवाडी हा चित्रपट खळखळून हसवणारा असला तरी बॉक्स ऑफिसवर थोडा बोंबलेलाच आहे.
चित्रपटाची कथा थेट दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. जर आपल्या कोकणात हिटलर आला असता तर काय झालं असतं ते विनोदी पद्धतीने दागवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केलेला आहे. तर कथा अशी आहे की, १९४२ च्या दरम्यान हिटलर (प्रशांत दामले) जर्मनी आणि विन्स्टन चर्चिल (आनंद इंगळे) ब्रिटन यांच्यात दुसरे महायुद्ध सुरू असताना अणुबॉम्ब बनवण्यासाठीचा फॉर्म्युला शोधण्यासाठी हिटलर जपानला जात असतो. परंतु परत येताना चुकून तो नेमका कोकणातील बोंबिलवाडी गावात पोहचतो. तो तिथे मग लपण्यासाठी पोलिस ठाण्यातील एका ट्रंकमध्ये जाऊन बसतो.
एकीकडे बोंबिलवाडीमध्ये काही नाटकमंडळी आहेत. वरवंटे (वैभव मंगळे) हे त्यांचे प्रमुख. तर गावातल्या गावात अजुन एक खतरनाक योजना आखली जात असते ज्यामध्ये नाटकमंडळीतील वैद्य बुवा (सुनील अभ्यंकर) आणि भास्कर (प्रणव रावराणे) हे पोलिस स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार असतात. तर नेमके वैद्य बुवा नाटकाच्या प्रयोगासाठी जाताना पोलिस प्रमुख कूक(अद्वैत दादरकर) यांना नाटक बघायला घेऊन जातात आणि सोबत नाटकाचे पोशाख असलेली ट्रंक. आता पुढची गंमत सांगायला नकोच. ती तुम्ही स्वतः चित्रपट बघा आणि अनुभवा. पुढे जाऊन हिटलर ट्रकमधून बाहेर पडल्यावर चर्चिल सुद्धा येऊन टपकतो. आता कोकणी माणसं, चर्चिल आणि हिटलर हा सगळा गोंधळ प्रेक्षकांना हसवतो इतकं नक्की.
परंतु बऱ्याच ठिकाणी चित्रपटाची कथा तुटक वाटते. नाटकीय रूपांतर असलं तरी तेवढी मजा येत नाही. परंतु चित्रपट एकंदर गमतीदार पद्धतीने आपल्याला हसवतो. एकदा बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
२. संगीत मानापमान (Sangeet Manapmaan) |
लेखक | शिरीष देशपांडे, प्राजक्त देशमुख, उर्जा देशपांडे |
दिग्दर्शक | सुबोध भावे |
कलाकार | सुबोध भावे,वैदेही परशुरामी,सुमीत राघवन,निवेदिता सराफ,नीना कुळकर्णी,शैलेश दातार,उपेंद्र लिमये |
निर्माता | ज्योती देशपांडे, सुनील फडतरे |
रिलीज तारीख | १० जानेवारी २०२५ |
भाषा | मराठी |
“संगीत मानापमान” चित्रपट समीक्षा :-
बहुचर्चित संगीत मानापमान हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या बाबतीत मिश्र प्रतिक्रिया आल्या. हा चित्रपट कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या रंगमंचावरील संगीत मानापमान या नाटकावर आधारित आहे. याचा चित्रपट बनवण्याचा घाट खरं तर सुबोध भावे यांनी घातला. शिरीष गोपाळ देशपांडे आणि सुबोध भावे यांनी ही कथा थोडीशी चित्रपटाच्या अनुषंगाने लिहीली आहे.
खरं तर संगीत हा चित्रपटाचा गाभा आहे परंतु जी अपेक्षा ठेवून आपण चित्रपट बघतो ती संगीताच्या बाबतीत पूर्ण होताना दिसत नाही. ज्यांना नाटक माहीत आहे त्यांना धैर्यधर आणि भामिनी ची ही कथा माहीत असेलच. परंतु ज्यांना माहीत नाही त्यांना नव्याने पाहील्यावर हा चित्रपट थोडा आवडू शकतो. चित्रपटाची कथा संग्रामपूर नावाच्या राज्यात घडणारी आहे. राणी सरकार (निवेदिता सराफ) ही संग्रामपूरची राणी आहे. आणि याच संग्रामपूरवर सत्ता मिळविण्यासाठी धीरेनराजा (उपेंद्र लिमये) हा प्रयत्नशील असतो. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी सैन्याला प्रशिक्षण देणारे काकासाहेब (शैलेश दातार) हे सेनापती डोळ्यात तेल घालून काम करत असतात. तर चंद्रविलास (सुमीत राघवन) हा राज्याचा उपसेनापती असतो. खरं तर काकासाहेब यांची मुलगी भामिनी हीच्याशी लग्न करून स्वतः सेनापती बनण्याचं स्वप्न चंद्रविलास पाहत असतो. तर एकीकडे आपले प्राण वाचवल्याबद्दल गरीब मेंढपाळ असलेल्या धैर्यधर (सुबोध भावे) याला सैन्यात प्रवेश देऊन त्याला भावी सेनापती म्हणून स्वप्न बघत असतखत आणि ते साकार करण्यासाठी त्याला तसं प्रशिक्षण देत असतात. तसंच भामिनीला सुद्धा धैर्यधर सोबत लग्न करावं अशी इच्छा व्यक्त करतात आणि इथुनच खरी कथा सुरू होते. असं झालं तर चंद्रविलासचं स्वप्न धुळीस मिळालं असतं म्हणून तो काय काय कारस्थान करतो.? भामिनीसोबत कोणाचं लग्न होतं.? धीरेनराजाचं काय होतं.? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटात काही जुनी गाणी तर काही नवीन गाणी आहेत. शंकर एहसान लॉय यांचं संगीत तर समीर सामंत यांनी लिहिलेली नवीन गाणी छान आहेत. परंतु सुबोध भावे यांचं दिग्दर्शन जरा कमी पडलं. चित्रपट खिळवून ठेवण्यात कमी पडतो. काही ठिकाणी अति नाटकी वाटतं सगळंच. परंतु एकंदर संगीताचे शौकीन असाल तर चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
३. मंगला (Mangla) |
लेखक | सौरभ चौधरी |
दिग्दर्शक | अपर्णा हॉशिंग |
कलाकार | शिवाली परब, शशांक शेंडे, अलका कुबल |
निर्माता | अपर्णा हॉशिंग, याश्ना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर |
रिलीज तारीख | १० जानेवारी २०२५ |
भाषा | मराठी |
“मंगला” चित्रपट समीक्षा :-
साधारण १९७५ साली वाराणसी मधील ही घटना आहे. स्वतःवर झालेला दुर्दैवी ॲसिड हल्ला आणि त्यानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे या घटनेतून सावरून जिद्दीने स्वतःचा नवीन प्रवास करणाऱ्या आणि स्वतःला सिद्ध करणाऱ्या मंगला यांची ही कथा आहे. भारतातील ही पहिलीच अशी ॲसिड हल्ल्याची घटना. चित्रपटाची कथा ‘सीरत’ या आत्मकथात्मक पुस्तकावर आधारित आहे. अर्थात चित्रपटात दाखवताना कथा महाराष्ट्रात घडतेय असं दाखवलं आहे. आणि गोष्ट आहे मंगला देशपांडे ची(शिवाली परब).
मंगला ला लहानपणापासूनच गाण्यामध्ये विशेष आवड असलेल्या मंगलाला शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्नासाठी मागणी येते. तिच्या काकांनीच हे लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. परंतु मंगलाला इतक्यात लग्न न करता आधी शिक्षण पूर्ण करायचं असतं म्हणून ती त्या लग्नासाठी नकार देते. आणि हाच नकार सहन न झाल्याने तिच्यावर होणाऱ्या नवऱ्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून ॲसिड हल्ला होतो. ज्यामुळे तिचा पूर्ण चेहरा विद्रूप दिसू लागतो. तिच्या विद्रूप चेहऱ्यामुळे सुरुवातीला ती तिचा आत्मविश्वास गमावून बसते. तिला समाजात एक वेगळ्या प्रकारची वागणूक मिळायला लागते. लोकांच्या कुत्सित नजरा, हेटाळणी, कुजबुज या सगळ्यामुळे तिची शाळा सुटते. परंतु खचून न जाता मंगला स्वतःचा आत्मविश्वास टरत आणते. ती गाणं पुन्हा शिकायला लागते. तिच्या स्वतःच्या महाविद्यालयात वॉर्डनची नोकरी स्वीकारते. आणि नंतर मात्र त्याच महाविद्यालयात ती संगीत प्राध्यापक म्हणून रूजू होते.
एकंदर ॲसिड हल्ला झाल्यानंतरचा मंगलाचा प्रवास या चित्रपटात पहायला मिळतो. या कथानकावर अजून चांगल्या प्रकारे काम करून चित्रपट मनोरंजक बनवता आला असता. परंतु मंगलाचा संघर्ष दाखवण्याच्या नादात चित्रपटात नैराश्याची झालर जास्त जाणवते. शिवाली परब हिला आतापर्यंत विनोदी भूमिकेत बघत आलोय परंतु तिने ही भूमिका अतिशय सक्षमपणे निभावली आहे. इतर कलाकारांच्या वाट्याला भूमिका कमी आहेत परंतु परिणामकारक आहेत. दिग्दर्शन ठीक आहे. एकंदर एका सत्य घटनेवर आधारित एक प्रेरणादायी चित्रपट म्हणून बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
४. जीलबी (Jilabi) |
लेखक | मच्छिंद्र बुगडे |
दिग्दर्शक | नितीन कांबळे |
कलाकार | स्वप्नील जोशी,प्रसाद ओक,शिवानी सुर्वे,पर्ण पेठे,गणेश यादव,प्रणव रावराणे,अश्विनी चावरे |
निर्माता | आनंद पंडित, रूपा पंडित |
रिलीज तारीख | १७ जानेवारी २०२५ |
भाषा | मराठी |
“जीलबी” चित्रपट समीक्षा :-
मल्याळम, तमिळ ते अगदी बॉलिवूड पर्यंत सध्या सस्पेन्स, थ्रिलर,क्राईम किंवा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची निर्मिती जास्त होते कारण प्रेक्षकांना हल्ली तसेच चित्रपट बघायला जास्त आवडतात. म्हणूनच मराठी निर्माते दिग्दर्शक सुद्धा आजकाल असे चित्रपट बनवण्याच्या शर्यतीत भाग घेऊ लागलेत. परंतु अशा चित्रपटांमध्ये महत्वाची असते ती कथा आणि पटकथा. त्यात किती ट्विस्ट आहेत, किती रहस्य आहेत, ती कशी बाहेर येतात, शेवटपर्यंत तुम्हाला ती खिळवून ठेवतात यावर चित्रपटाचं यश अवलंबून असतं. परंतु हाच महत्त्वाचा भाग विसरून बनवण्यात आलेला जीलबी हा चित्रपट प्रेक्षकांना निराश करण्यात यशस्वी झाला आहे.
जीलबी सारखं प्रेक्षकांना शेवटपर्यंत गोल गोल गुंडाळून पात्रांची जुळवाजुळव करण्यात प्रेक्षकांना अर्धी शक्ती वाया घालवायला लावून शेवटी पदरी पडते ती निराशाच.
चित्रपटाची कथा सुभेदार कुटुंबाच्या जावयाच्या खुनाच्या अवतीभवती फिरते. कोट्यवधींचे मालक असलेले सुभेदार हे व्यावसायिक साम्राज्यातील श्रीमंत असं कुटुंब. सुभेदार कुटंबीयांचा जावई आशुतोष (अभिजित दुलगच) याची हत्या झाल्यानंतर एकच गोंधळ उडतो. या हत्येचा तपास करण्यासाठी एन्ट्री होते स्वतः भ्रष्ट असलेल्या पोलीस अधिकारी एसीपी विजय करमरकर (स्वप्निल जोशी) याची.
तपासाची पहीली सुई जाते कुटुंबातील मोठा मुलगा
विजय सौरव सुभेदार (प्रसाद ओक) याच्याकडे, मग संशयाच्या भोवऱ्यात हळूहळू सगळेच अडकत जातात. सौरवची पत्नी जान्हवी (शिवानी सुर्वे), सौरवचा जुळा भाऊ गौरव सुभेदार (म्हणजे प्रसाद ओक च), सौरवची बहीण म्हणजे जीच्या नवऱ्याचा खून झालाय असे सगळेच संशयित असतात. त्यातच हळूहळू खूनांचा आकडा वाढत जातो. याचा खून, त्याचा खून. या नादात मुळात कोण कोणाचा काय लागतो ही नाती कळण्याआधी खून होतात त्यामुळे पटकथेची अक्षरशः जीलबी होऊन जाते.
पात्रांचा इतका भरणा आणि पटकथेतील विसंगती किंवा नीट मांडणी न केल्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटतो. कलाकारांनी अभिनय उत्तम केला असला तरी दिग्दर्शन तेवढ्या सक्षमतेने न केल्यामुळे चित्रपट फसलेला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
५. मिशन अयोध्या (Mission Ayodhya) |
लेखक | कृष्णा दादाराव शिंदे |
दिग्दर्शक | समीर रमेश सुर्वे |
कलाकार | निलेश देशपांडे, तेजस्वी पाटील, डॉ.अभय कामत, सतीश पुळेकर,गुरुवेश पंडित,श्रावणी शिंदे |
निर्माता | कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे |
रिलीज तारीख | २३ जानेवारी २०२५ |
भाषा | मराठी |
“मिशन अयोध्या” चित्रपट समीक्षा :-
राम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिराच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावरच प्रदर्शित झालेला मिशन अयोध्या हा चित्रपट समीर रमेश सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेला असून कृष्णा शिंदे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. कथा अर्थातच भक्त आणि त्यांची अयोध्या नगरीतील रामलल्लाच्या दर्शनासाठी असलेली ओढ याभोवती फिरते.
चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरू होते. इथल्या एका शाळेतील ठराविक २० मुलांची सहल अयोध्येतील राममंदिर बघण्यासाठी चाललेली असते. हिंदूंसाठी हे राममंदिर किती महत्वाचे आहे किंवा याचा इतिहास काय आहे हे मुलांना कळावं म्हणून या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु मुलांची सहल जशी अयोध्या येथे पोहचते तसं वेगळ्या गोष्टी घडायला सुरुवात होते. मुलं जातात त्याच दरम्यान काही दहशतवादी राममंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्लॅन करत असतात परंतु मुलांच्या चालाखीमुळे त्यात अडथळा येतो आणि ते दहशतवादी मुलांना पकडून कैद करतात. आता पुढे काय होतं, दहशतवाद्यांची योजना कशी फसते
हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाची कथा पटकथा अगदीच ठिकठाक आहे. रामभक्त किंवा हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी नेहमीच मुस्लिम द्वेष निर्माण करावा का लागतो हा प्रश्न पडतो. एकंदर एका ठराविक समुदायावियोधात हा चित्रपट अधिक भाष्य करतो. चित्रपटाची कथा पटकथा यात काही नाविन्य नाही. दिग्दर्शन ठिकठाक आहे. अभिनय, गाणी यात खास काही छान म्हणावं असं नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
६. फसक्लास दाभाडे (Fussclass Dabhade) |
लेखक | हेमंत ढोमे |
दिग्दर्शक | हेमंत ढोमे |
कलाकार | निवेदिता सराफ,राजन भिसे,उषा नाडकर्णी,क्षिती जोग,सिद्धार्थ चांदेकर,अमेय वाघ,हरीश दुधाडे,राजसी |
निर्माता | भूषणकुमार, आनंद एल. राय, क्षिती जोग |
रिलीज तारीख | २४ जानेवारी २०२५ |
भाषा | मराठी |
“फसक्लास दाभाडे” चित्रपट समीक्षा :-
झिम्मा चे दोन्ही भाग प्रेक्षकांना खूप आवडले आणि भावले. म्हणूनच हेमंत ढोमे कडून या चित्रपटाच्या बाबतीत अपेक्षा जास्त होत्या. परंतु फसक्लास दाभाडे या चित्रपटाला फसक्लास मिळता मिळता राहीला. खरं तर सगळेच कलाकार अफलातून काम करणारे होते परंतु हेमंत ढोमे यांनी लिहिलेली पटकथा थोडीशी कमी पडली. मुलगी वयात आल्यानंतर घरातील आई किंवा बहीण तिला मासिक पाळी बद्दल असेल किंवा अन्य काही गोष्टी समजावून सांगते परंतु पुरूषांच्या बाबतीत हे होत नाही. अशा काही महत्त्वाच्या संवेदनशील मुद्द्यांना हेमंत ने हात घातलाय परंतु ते अगदीच थोडक्यात आवरलंय असं वाटतं. त्यात सखोलता दिसत नाही. एकाच वेळी अनेक भावनांचे पदर उलगडून दाखवले गेले आहेत परंतु त्यामुळे ते अर्धवट किंवा तुटक वाटतात.
मोठं एकत्र कुटुंब म्हटलं की वाद, भांडणं, गैरसमज हे असतातच पण यातूनच ही किती समृद्ध आहेत हे परिस्थितीनुसार कळतं. या चित्रपटात सुद्धा हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा दाभाडे कुटुंबियांनी भोवती फिरते. मोठ्या भावाचं म्हणजेच किरण(सिद्धार्थ चांदेकर)याचं ठरलेलं लग्न काही कारणास्तव मोडलेलं असतं. आणि त्यानंतर तो रागाने घर सोडून निघून गेलेला असतो परंतु आता लहान भावाच्या म्हणजे प्रशांत (अमेय वाघ) याच्या लग्नासाठी घरी आलेला असतो. प्रशांत आणि कोमल(राजसी भावे) यांचं लग्न पार पडतं आणि मग नवीन नवरी घरी येते. परंतु आपलं लग्न मोडल्याचा राग मनात असलेला किरण घरात भांडणं, चिडचिड करायला सुरुवात करतो. आता तो तसं का लागत असतो हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. एकीकडे या दोघांची बहीण जयश्री(क्षिती जोग) ही आई बनण्यासाठी आयव्हीएफ उपचार परत एकदा करून घेण्यासाठी नवरा सचिन(हरिष दुधाणे) याला समजावत असते. तिची आई होण्यासाठी होत असलेली तगमग आणि सचिन आहे त्यात समाधान मानू अशा विचारांचा असतो. तर किरण आणि त्याचे वडील यांच्यातील अबोला, या तिघांची आई हीची कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी चाललेली धडपड असं सगळं या चित्रपटात बघायला मिळतं. अबोला असला तरी मनातून घट्ट असलेली नाती खरी नाती असतात हे बघायला मिळतं.
एक हलकाफुलका मनोरंजन करणारा चित्रपट म्हणून बघायला हरकत नाही. हेमंत ढोमे याने गावाकडील एक कुटुंब, तिकडचं वातावरण, पद्धती यावर विशेष भर दिला आहे. सगळ्या कलाकारांनी मिळालेल्या छोट्या भूमिकांमधून सुद्धा छान काम केलेलं आहे. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट आता उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
७. इलू इलू १९९८ (ILU ILU 1998) |
लेखक | नितीन विजय सुपेकर |
दिग्दर्शक | अजिंक्य बापू फाळके |
कलाकार | निशांत भावसार, गौरव कलुष्टे,अंकिता लांडे,श्रीकांत यादव,मीरा जगन्नाथ |
निर्माता | बाळासाहेब फाळके, हिंदवी फाळके |
रिलीज तारीख | ३१ जानेवारी २०२५ |
भाषा | मराठी |
“इलू इलू १९९८” चित्रपट समीक्षा :-
मराठी चित्रपट निर्माते किंवा दिग्दर्शक यांची प्रेक्षकांच्या नावाने नेहमी बोंब असते की मराठी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात जात नाहीत परंतु याला सर्वस्वी जबाबदार आपण आहोत हे मात्र यांच्या लक्षात येत नाही. त्याच त्याच रटाळ कथा पटकथा आणि तेच तेच विषय घेऊन चित्रपट निर्मिती करून सुमार दिग्दर्शन आणि अभिनय असेल का जातील प्रेक्षक चित्रपटगृहात. पौगंडावस्थेतील मुलांच्या आयुष्यात होणारा भावनिक बदल किंवा आकर्षण यावर आतापर्यंत कित्येक चित्रपट येऊन गेले आहेत. त्यातल्या त्यात शाळा आणि त्या वयात होणारं प्रेम वैगरे हे घासून घासून गुळगुळीत झालेले विषय परंतु आता पुन्हा याच अशाच धर्तीवर ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला इलू इलू हा चित्रपट अजिंक्य बापू फाळके
यांनी दिग्दर्शित केलेला असून या चित्रपटाची कथा नितीन विजय सुपेकर यांनी लिहीली आहे.
कथा नेहमीचीच. अनिकेत सुर्वे (निशांत भावसार) हा एक पौगंडावस्थेतील शाळेत शिकणारा व्रात्य मुलगा असतो. त्याच्या शाळेत खास इंग्रजी विषय शिकवण्यासाठी गोव्यावरून शिक्षिका माधुरी पिंटो (एली अवराम) या येतात आणि सगळी सुत्रंच बदलतात. दिसायला सुंदर असलेल्या पिंटो मॅडम सगळ्यांनाच आवडतात परंतु अनिकेत ला खास आकर्षण निर्माण होतं. अनिकेत हा चांगला चित्रकार असतो, तो या पिंटो मॅडम चं एक छान स्केच काढतो पुढे जाऊन त्या स्केचमुळे कथेला वेगळं वळण मिळतं.
दुसरीकडे अनिकेतचे वडील मिलिंद सुर्वे (श्रीकांत यादव) आणि हेमा (मीरा जगन्नाथ) यांच्यातील प्रेमाचा एक वेगळाच ट्रॅक बघायला मिळतो. ही हेमा अनिकेत च्या चाळ वजा वाड्यात नव्याने रहायला आलेली असते. आता अनिकेतचे वडील आणि हेमा यांचं पुढे काय होतं.? स्केचवरून नक्की काय गोंधळ होतो.? हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटात नवीन असं काही बघायला मिळत नाही. दिग्दर्शन ठिकठाक आहे. पटकथा अजून चांगल्या प्रकारे गुंफता आली असती. चित्रपट बघताना शाळेतील दिवस नक्कीच आठवतात पर्यायाने ते गुलाबी दिवसही आठवतील. कधीतरी टाईमपास म्हणून बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. बाकी चित्रपटात भारी असं काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
८. मुक्काम पोस्ट देवाचं घर (Mukkam Post Devach Ghar) |
लेखक | संकेत माने |
दिग्दर्शक | संकेत माने |
कलाकार | मायरा वायकुळ,स्पृहा परब,कल्याणी मुळे,मंगेश देसाई,सचिन नारकर,उषा नाडकर्णी,सविता मालपेकर |
निर्माता | महेश जायसवाल, किर्ती जायसवाल |
रिलीज तारीख | ३१ जानेवारी २०२५ |
भाषा | मराठी |
“मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपट समीक्षा :-
मुक्काम पोस्ट देवाचं घर हा चित्रपट संकेत माने लिखित आणि दिग्दर्शित असून मायरा वायकुळ हीची यात मध्यवर्ती भूमिका आहे. लहान मुलांना नेहमीच वेगवेगळे जगावेगळे प्रश्न पडत असतात. त्यांच्या प्रश्नांची त्यांना समजतील अशा भाषेत उत्तरं द्यायचं काम म्हणजे एक मोठी कामगिरी असते. त्यातच जवळच्यांपैकी जर कोणाचा मृत्यू झाला तर ती व्यक्ती कुठे गेली काय झालं असे अनेक प्रश्न या मुलांना पडतात. मग अशा वेळी आपण त्यांना ती व्यक्ती बाप्पाच्या घरी गेलीय असं सांगून समजूत काढतो. याच धर्तीवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ही गोष्ट आहे जिजा नावाच्या मुलीची.
आपल्या आईसोबत (कल्याणी मुळे) आणि आजीबरोबर (सविता मालपेकर) राहणारी जिजा (मायरा वायकुळ) ही एक गोड, समंजस पण तेवढीच खट्याळ अशी गोड मुलगी असते. एकदा वर्गात लपूनछपून चॉकलेट खाल्लं म्हणून शिक्षिका जिजाला आणि तीची मैत्रीण शुभ्राला शिक्षा देतात. बघायला गेलं तर शिक्षा तशी सोपी असते परंतु जिजासाठी ती अवघड होऊन बसते कारण जिजाला ‘माझे बाबा’ या विषयावर भाषण करण्याची शिक्षा मिळते. आणि जिजाने आपल्या बाबांना त्यांना कधीच पाहिलेलं नसतं. कारण तिचे बाबा सीमेवर लढताना शहीद झालेले असतात. त्यामुळे जिजाला आपल्या बाबांबद्दल काय बोलावं हे आठवत नसतं. तर एकीकडे गावच्या सरपंच असलेल्या एक आजी (उषा नाडकर्णी) जिजाला एक पत्र पोस्टात टाकण्याचं काम सांगते ते पत्र त्या आपल्या मुलाला अमेरिकेला पाठवत असतात. आणि मग जिजाच्या डोक्यातील बल्ब पेटतो तिला वाटतं इपले बाबा देवाच्या घरी तर गेलेत मग त्यांना तिकडे पत्र पाठवू आणि त्यांच्याशी बोलू. इथून पुढे खरी गोष्ट सुरु होते. जिजा आपल्या बाबांना लिहीते त्या प्रत्येक पत्रात ती तिचं अख्खं बालपण मांडत असते. रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी लिहीत असते.या सगळ्यातून जिजाचं भावविश्व उलगडून दाखवलं आहे. पत्रांमुळे जिजाला आपल्या बाबांना भेटता येऊ शकतं असं वाटत असतं. आता ते तसं का वाटतं.? जिजाला बाबांना भेटण्याची जी ओढ असते ती पूर्ण होते का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
एकदा नक्कीच बघू शकतो आणि लहान मुलांना दाखवू शकतो असा हा चित्रपट आहे. मायराने छान अभिनय केला आहे. आपली मैत्रीण शुभ्रा आणि तीचे वडील यांच्यातील प्रेम बघून आपल्या वडीलांची आठवण काढणाऱ्या जिजाचं भावविश्व मायराने सुंदर साकारलं आहे. इतरही कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. दिग्दर्शन सुद्धा छान आहे. एक साधी हलकीफुलकी तरल नात्यांचे पदर उलगडून दाखवणारी ही कथा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
तल मंडळी वरील पैकी तुम्ही कोणते चित्रपट आवडले किंवा जे पाहिले नसतील तल या विकेंडला कोणता चित्रपट बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.